खेळाडू चांगला प्रशासक होऊच शकत नाही, या मताला जगमोहन दालमिया यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतून खोटे ठरवले आह़े   
जोराबगान क्लब (१९५७-६०), राजस्थान क्लब (६०-६२) आणि नॅशनल अ‍ॅथलेटिक क्लब (६३-७८) मधून सलामीला उतरणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज दालमिया यांनी १९६३ मध्ये क्रिकेट प्रशासनात प्रवेश केला़  राजस्थान क्लबच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर त्या काळात सोपविण्यात आली़  १९७८ मध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचे सचिव बिस्वनाथ दत्त यांनी त्यांच्याकडे कोषाध्यक्षपद सोपवल़े  त्यानंतर बंगाल संघटनेचे सहसचिव आणि १९९३ मध्ये अध्यक्षपद त्यांनी मिळवले   
१९८३ मध्ये एनकेपी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात कोषाध्यक्ष म्हणून प्रवेश केला़  १९८७ ची विश्वचषक स्पर्धा भारतात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.  १९९० मध्ये बीसीसीआयचे सचिवपद आणि त्याच वर्षी आशियाई क्रिकेट परिषदेचे सचिवपद त्यांच्याकडे चालून आल़े   १९९६ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली़    १९९७ मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल़े  २००१-०४ या कालावधीत दालमियांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविल़े