गेली तीन वर्षे सातत्याने होत असलेली गारपीट असो, उत्तराखंडमधला मोठा पूर असो किंवा दुष्काळ. यंदा आणि गेल्या काही वर्षांमध्ये घडत असलेल्या अशा सगळ्या आपत्तींना जागतिक हवामानबदल अर्थात क्लायमेट चेंज कारणीभूत असल्याची एकीकडे चर्चा केली जाते तर दुसरीकडे हे मुद्दे खोडून काढणारी मांडणीही केली जाते. नेमकं खरं काय? क्लायमेट चेंज/ ग्लोबल वॉर्मिगच्या दोन्ही बाजूंची उलटतपासणी करणारी कव्हरस्टोरी-

‘सायंटिफिक अमेरिकन’ या दर्जेदार मासिकात पृथ्वीचे तापमान वाढत असल्याची माहिती एका शास्त्रज्ञाने १९९०च्या सुमारास एका लेखाद्वारे दिली होती. हवेत वाढत असलेले कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हेच त्याचे कारण असल्याचे त्याने म्हटले होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या वाढणाऱ्या प्रमाणामागे वाढते औद्योगिकीकरण असल्याचा त्याचा दावा होता. त्याच विषयावर १९९४ साली हैदराबादमध्ये एक चर्चासत्र आयोजले गेले होते. या चर्चासत्रात पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ औद्योगिकीकरणामुळे होत असल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला. पुरावा म्हणून गेल्या दोनशे वर्षांत शहरांत आणि सागरांवर केल्या गेलेल्या तापमानाच्या नोंदी, त्यावर आधारित गणिती प्रतिकृती (mathematical models), कार्बन डायऑक्साइडचे हवेतील वाढते प्रमाण यांची आकडेवारीही दाखवली. परिणाम म्हणून हिमपर्वतावरील बर्फ वितळणे, नद्यांना पूर येणे, समुद्राची पातळी उंचावणे, इतकेच नव्हे तर वादळे, वणवे, दुष्काळ यांची संख्या वाढण्याची भीती काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली. पुराव्यासाठी आकडेवारी, आकृत्या, फोटो इत्यादी सादर केले. चर्चासत्राच्या अध्यक्षांनी येऊ घातलेली परिस्थिती, इंधनांचा वापर, औद्योगिकीकरण यांची सांगड घालताना विकसनशील देशांना पडणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
सत्राच्या सभासदांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाल्याचे मधल्या सुटीत जाणवले, पण दुसऱ्या सत्रांत एका वैज्ञानिकाने सर्व काळजी दूर करणारे भाषण दिले. हवामान अभ्यासण्याची स्थळे, पद्धती, निष्कर्ष काढण्याची घाई या सर्वावर त्याने हल्ला चढवला आणि हवामानात होणाऱ्या बदलांना उद्योगधंद्यातील वाढ हे कारण नसल्याचे ठासून सांगितले. अन्य काही वैज्ञानिकांनी त्याला पुष्टी दिली.
दिवसाच्या शेवटी चर्चा ऐकणाऱ्या सभासदांच्या मनात गोंधळ उडालेला जाणवला, तर वक्त्यांमध्ये दोन गट पडलेले दिसले. पृथ्वी तापण्यास मानवी कृती कारण आहे, असे म्हणणारा आणि मानव जबाबदार नाही असे समजणारा.
पुराणातली वांगी पुराणातच
वरील अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर, मुंबई विद्यापीठात याच विषयावर होत असलेल्या चर्चासत्रामध्ये भाग घेण्याचा प्रश्न आल्यावर मी विचारात पडलो. लहानपणी वाचलेल्या जगबुडीच्या कथा आठवल्या. त्याच सांगून चर्चासत्राला सुरुवात करून द्यायचे ठरवले. एका वाढणाऱ्या माशाच्या मदतीने पुरातून वाचल्यानंतर मनूने पुन्हा सृष्टी निर्माण केली. ही एक पुराणातली कथा. प्राण्यांच्या जोडय़ा ‘आर्क’वर चढवून त्यांना जगबुडीतून वाचवून जीवसृष्टीला पुनरुज्जीवित करणारा नोहा, ही बायबलमधील कथा. विष्णूच्या दहा अवतारांतील पहिले दोन अवतार मत्स्य आणि वराह यांच्या मदतीने सृष्टी तारून नेल्याच्या कथा. पुन्हा पूर येऊन जगबुडी होणार असे सुचवणारा दहावा अवतार कल्की. कथा पुराणांतल्या, पण त्या सांगणारे ऋषीमुनी- त्यांना सृष्टीतील घडामोडींचा अभ्यास करणारे विद्वज्जन समजावे का? इतिहासपूर्व काळात आणि ज्ञान असलेल्या ऐतिहासिक काळात अनेक वेळा कोरडे आणि ओले दुष्काळ, पूर-वादळे येऊन गेल्याचे दाखले उपलब्ध आहेत. पृथ्वीचे तापमान वाढवणारे कार्बन डायऑक्साइड (Co2), नायट्रोजन ऑक्साइड्स (N2O), मिथेन इत्यादी वायूंची वाढ करणारे उद्योग त्या काळात तर अस्तित्वात नव्हते. मग, अशा हवामान बदलांना माणूस कसा कारणीभूत समजायचा? विचारांस चालना देण्यासाठी या सर्वाचा उल्लेख करणे योग्य वाटले.
समस्येची पाश्र्वभूमी
सन १९७० मधील स्टॉकहोम कॉन्फरन्स, १९७१-७२ मधील विलाख कॉन्फरन्स आणि त्यानंतरच्या विलाखमधीलच १९८० आणि १९८५ च्या बैठका, यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल पुरेशी जाणीव निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून युनायटेड नेशन्स एन्व्हायरन्मेंट प्रोग्रॅम (UNEP) आणि युनोची हवामान संस्था (World Meteorological Organization – WMO) यांच्या पुरस्काराने इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) ची स्थापना झाली. पृथ्वीवरील पर्यावरण आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे हे या पॅनेलचे कार्यक्षेत्र ठरले. देशोदेशींच्या शासनांनी (राजकारणी, शासकीय अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांनी) या पॅनेलसाठी सभासद नेमले. पॅनेलने १९८७ साली पृथ्वीभोवतीच्या ओझोन छत्राच्या रक्षणासाठी क्लोरोफ्लुरो कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने माँट्रिअल प्रोटोकॉल आखला. पृथ्वीचे तापमान वाढवणारे वायू कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व मिथेन यांचे उत्सर्जन कमी व्हावे यासाठी क्योटो प्रोटोकॉल आखला. या प्रोटोकॉलमुळे पृथ्वीचे तापमान वाढणे थांबावे, हिमनग वितळून नद्यांना पूर येणे व समुद्राची पातळी वाढणे, समुद्राकाठचे प्रदेश पाण्याखाली जाणे या गोष्टी टाळता येतील असा उद्देश होता. १९९२ मध्ये रिओ-द-जानेरो येथे भरलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत क्योटो प्रोटॉकॉल संमत केला गेला. याप्रमाणे पृथ्वीच्या हवामानावर मानवाचा पर्यायाने उद्योगधंदे व इतर विकासकार्याचा परिणाम अधोरेखित केला गेला.
भाकितांचे भांडवल
पॅनेलच्या तिसऱ्या अहवालात, विसावे शतक आधीच्या एक हजार वर्षांत अनुभवलेल्या तापमानापेक्षा जास्त गरम असल्याचे म्हटले आहे. यास मानवी उद्योगच कारणीभूत असल्याचे दाखवण्यात आले होते. या अहवालास सन २००२ मध्ये सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरन्मेंट पॉलिसी प्रोजेक्ट (SEPP) च्या वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला.
पॅनेलच्या २००७ च्या अहवालात म्हटले होते, ‘पृथ्वीचे तापमान वाढण्यास मानवनिर्मित कारणे जबाबदार असावीत’. युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मात्र संदिग्धता काढून टाकून ‘मानवी उद्योग, विशेषत: खनिज इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे वातावरण बिघडत असून त्यामुळे पूर-दुष्काळ यांसारखी अरिष्टे येतील, जीवसृष्टीचा ऱ्हास होईल आणि मानवी संस्कृतीलाच तडाखे बसतील,’ असे भाकीत वर्तवले होते.
या भाकितामुळे या अहवालास अफाट प्रसिद्धी मिळाली. विज्ञान बाजूला पडले आणि वातावरणातल्या लहानसहान फरकातसुद्धा अरिष्ट शोधले जाऊ लागले. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सेमिनार यासाठी खाद्य मिळत राहिले. ‘रस्त्याबाजूच्या झाडांवर कुऱ्हाड पडल्याने शहरांत पाऊस पडेनासा झाला,’ अशा बातम्यांचे पीक आले. जगातल्या कोणत्याही अरिष्टाचे नाते पृथ्वीच्या मानवनिर्मित तापमानवाढीशी जोडले जाऊ लागले. अमेरिकेच्या उपध्याक्षांनी इनकन्व्हिनियंट ट्रथ नावाचा एक अरिष्ट चित्रपट (Disaster movie) तयार केला आणि जगात अतिप्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार या चित्रपटास आणि चित्रपटास खाद्य देणाऱ्या आयपीसीसी या संस्थेला देण्यात आला.
मतमतांतरे आणि पुरावे
सर्वसामान्य सुशिक्षितांना मात्र अशा अहवालांवर विश्वास ठेवणे जड गेले. दोनशे वर्षांपासून उद्योगक्रांती करून ज्या देशांनी आपला विकास करून घेतला तेच आता विकसनशील देशांना विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करताहेत, इंधन वापरायला प्रतिबंध करताहेत, पूर्वीची गुलामी संपुष्टात आल्यामुळे आता नवी आर्थिक गुलामी लादू पाहात आहेत, अशा तऱ्हेची हाकाटी सुरू झाली. अनेक वैज्ञानिकही अशा अहवालावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांनी संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण प्रबंध तयार केले. त्यांची कार्यशाळा सन २००७ मध्ये व्हिएन्ना येथे भरली आणि एक वृत्तांत २००८ मध्ये प्रसिद्ध केला.‘नेचर, नॉट ह्य़ूमन अ‍ॅक्टिव्हिटी, रुल्स द प्लॅनेट.’ आंतरराष्ट्रीय पॅनेलने मांडलेल्या मुद्दय़ांवर आक्षेप नोंदवून ते मुद्दे खोडून काढले. त्यापैकी नमुन्यादाखल दोन मुद्दे येथे देत आहे-
१. भूगर्भातील पुराव्यांनुसार ३६.५ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा निसर्ग महाकाय वृक्ष जोपासत होता, तेव्हा वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण १५०० पीपीएम (parts per million) होते. वीस कोटी वर्षांपूर्वी जेव्हा सृष्टी विविध वनस्पतींनी नटली होती, तेव्हा ते १८०० पीपीएम होते. सध्या हेच प्रमाण ३५० पीपीएमच्या आसपास आहे. म्हणजेच पुढील पन्नास वर्षांत ते चारशेच्या घरात पोहोचले तरी त्यामुळे वनस्पती (व जीवसृष्टी) नामशेष होतील ही भीती वृथा आहे.
२. कार्बन डाय ऑक्साइडचे हवेतील प्रमाण आणि हवेचे तापमान यांचे नाते जोडता येत नाही. एक हजार वर्षांपूर्वी जागतिक उष्ण काळात (Worldwide Medieval Warm Periodर जे तापमान होते त्यामानाने विसाव्या शतकाच्या शेवटीचे तापमान थंड वाटावे. आणि त्या हजार वर्षांपूर्वीच्या काळात हवेतला कार्बन डाय ऑक्साइड आतापेक्षा २५ टक्के कमी होता.
हवेत कार्बन डाय ऑक्साइड वाढल्यास वनस्पतींवर दुष्परिणाम होऊन त्या नामशेष होण्याची भीती पॅनेलच्या अहवालात व्यक्त केलेली आहे. परंतु अनेक प्रयोगांत सिद्ध झाल्याप्रमाणे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण दुप्पट झाल्यास झाडा-झुडपांची वाढ सुमारे तीस टक्क्यांनी वाढते. कारण झाडे तीन प्रकारचे (C3, C4  आणि CAM) प्रकाश संश्लेषणाचे मार्ग अवलंबतात. आंबा, चिंच यांसारखे वृक्ष व गोडय़ा आणि खाऱ्या पाण्यांत वाढणाऱ्या वनस्पतीही जास्त कार्बन डाय ऑक्साइडच्या सान्निध्यात जोमाने वाढतात. म्हणूनच, इंधन ज्वलनामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले तर वनस्पतिसृष्टी नामशेष होण्याच शक्यता नाकारली जाते. इतकेच नव्हे तर वाढलेल्या कार्बन डाय ऑक्साइडमुळे वनस्पती खार, निष्कृष्ट जमीन, ओझोन प्रदूषण अशा तणावांतही टिकून राहतात.
बहुतेक वनस्पती हवामान बदलास समर्थपणे तोंड देतात. वनस्पती नामशेष होण्याची खरी कारणे आहेत – लघुग्रह वर्षांव, वृक्षतोड, कृषिप्रसार आणि परक्या वनस्पतींची आयात. युनेपच्या एका अहवालाप्रमाणे दीडशे वर्षांपासून औद्योगिकीकरण, मनुष्यवस्ती आणि तापमान यात वाढ होत असूनही विसाव्या शतकाअखेपर्यंत जीवसृष्टीचा ऱ्हास अत्यल्प नोंदला गेला आहे.
थोडक्यात, हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण हजारो वर्षे बदलत आहे. औद्योगिकीकरणामुळे त्यात काहीशी भर पडत असली तरी त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते किंवा हवामान बदलते असे समजण्यास आधार नाही. सौरऊर्जेतील फरक (Solar Flares), सहस्रकातील गरम हवा (Medieval Warm Periods) अशा नैसर्गिक, मानवापलीकडच्या करणांमुळे हे बदल होतात हे आता सर्वमान्य होत आहे.
लेखक हे भारतातील प्रसिद्ध परीस्थितीकी तज्ज्ञ संशोधक (इकॉलॉजिस्ट) आहेत.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?
Nagpur Bench High Court
केवळ घटनास्थळी उपस्थित होते म्हणून… ३६ वर्षांनंतर निर्णय देताना उच्च न्यायालय काय म्हणाले जाणून घ्या

विकसनशील देशांना जाचक
औद्योगिकीकरण व वाहनांमुळे हवामान तापत आहे अशा विश्वासाने वाहनांची इंधनक्षमता वाढवण्यासाठी अशक्यप्राय बंधने घातली जाऊ लागली. औष्णिक ऊर्जानिर्मितीची किंमत विनाकारण वाढत गेली. कार्बन व्यापारासारखे नियम विकसनशील देशांना जाचक ठरू लागले.

आपण काय करावे?
हवामान बदलास मनुष्यप्राणी कारणीभूत नाही असे मानले तरी बदलत्या हवामानामुळे नुकसान होऊ नये, वा झालेच तर कमीत कमी कसे होईल, यासाठी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे, ते प्रश्न –
१. भारतासारख्या विकसनशील देशाने नैसर्गिक अरिष्टांपासून संरक्षण करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
२. भौगोलिक वसाहतवादातून मुक्त झाल्यावर आता आर्थिक वसाहतवादापासून दूर राहण्यासाठी कशा तऱ्हेची शास्त्रोक्त / वैज्ञानिक पायाबांधणी करावी?
३. आंतरराष्ट्रीय दबावाखाली न येण्यासाठी कसे मार्ग आखावे?

भातशेतीवरून वाद
भातशेतीमधून मिथेन हा पृथ्वीचे तामान वाढवणारा वायू निर्माण होतो. बहुतेक आशियाई लोक भात खाणारे, त्यांनी अन्नाच्या पद्धती बदलाव्या आणि भातशेती थांबवावी असा सल्ला दिला जाऊ लागला. भारतीय कृषिविज्ञान संस्था, औद्योगिक संशोधन संस्था, समन्वयित संशोधन प्रकल्पाद्वारे असे आढळून आले की भातशेतींतून निघणारा मिथेन पृथ्वीचे तापमान बदलू शकेल आशा प्रमाणात कधीच निर्माण होत नाही.
प्रा. शरद चाफेकर