आत्महत्या हे कोणत्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही. त्यातून प्रश्न सुटत नाहीत तर आहे तेथेच राहतात. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या कोणालाही ही वाक्यं ऐकवली तर तो आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त होण्याऐवजी कसली प्रवचनं झोडताय म्हणून आणखीनच अस्वस्थ होतो. किंबहुना तो आत्महत्येचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधू लागतो किंवा आत्महत्या केवळ प्रयत्न न राहता, खरंच सत्यात येईल याचा प्रयत्न करतो. पण त्याला जर यशस्वी आत्महत्या तंत्र आणि मंत्र, तीन दिवसांत शिका हमखास यशस्वी आत्महत्या असे क्लासेस घेतले जातात असे कोणी सांगितले तर नक्कीच तो काही क्षण गडबडून जाईल. आणि या क्लासमध्ये गेलाच तर त्याची अवस्था होईल, त्यातून तो नेमकं काय करेल, त्याची मानसिक अवस्था नेमकी कशी असेल याचा वेध ‘वेलकम जिंदगी’ चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पाच एक वर्षापूर्वीच आईचा मृत्यू झाला आहे. वडिलांनी दुसरं लग्न करून स्वत:साठी आधार शोधला आहे. आणि जुन्या मित्राशी लग्न ठरले असतानाच त्याची बाहेरख्याली उघडकीस आल्यामुळे लग्न मोडलेलं आहे अशी एक पत्रकार तरुणी मीरा. निराशाने ग्रासलेली. झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न करतानाच आनंद तिच्या घरी येतो आणि झोपेच्या गोळ्यांची विल्हेवाट लावतो. जसा स्वत:च्या जगण्यावर आपला अधिकार आहे, तसाच स्वत:ला हवे तेव्हा मरण्याचा हक्कदेखील असल्याचं तिला पटवून देतानाच, आत्महत्या ही यशस्वीच झाली पाहिजे, अन्यथा त्याला काही अर्थ नाही असे ठसवतो. आणि यशस्वी आत्महत्या तंत्र आणि मंत्र या शिबिरात तिला भरती करतो. आणि सुरू होते एक धम्माल. आत्महत्येचे विविध प्रकार यशस्वीपणे कसे हाताळावेत हे सांगणारं हे शिबीर. आत्महत्येच्या प्लॅनबद्दल चर्चा करणारं शिबीर. आयुष्याला कंटाळलेल्यांची गर्दी असणारं शिबीर. आणि या साºया वातावरणाने आत्महत्येच्या कल्पनेनेच घाबरून जाणाºयांचं शिबीर. या शिबिराभोवतीच चित्रपटाची कथा फिरत राहते. हॅपी एंडिंग सोसायटीचं हे शिबीर आत्महत्या शिकण्यासाठी आलेल्यांचं असते. पण आत्महत्या करण्याइतपत आपल्या आयुष्यात सारं काही संपलं आहे का याचा नकळत विचार करायला लावते आणि जगण्यातला आनंद न बोलता उलगडून दाखवते.

मूळ बंगाली कथानकावर आधारित ‘वेलकम जिंदगी’हा काहीसा नर्मविनोदी अंगाने जात मार्मिक भाष्य करणारा असा चित्रपट आहे. आत्महत्या रोखण्यापेक्षा ती यशस्वी कशी करावी हे सांगतानाच सहजपणे आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याच्या वाटेवर घेऊन जाणारं कथानक मांडण्याचा प्रयत्न यात आहे. आत्महत्येच्या कथानकाला पूरक सेटची जोड हा यातला प्रभावी भाग म्हणावा लागेल. एकदाचा जीव संपवून टाकतो असं म्हणणाऱ्यांना या सेटच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या शिकवणाऱ्यांच्या तोंडून आत्महत्या कशी करायची याचं प्रशिक्षण देताना तिरकस भाष्य बरंच काही सांगून जातं.

कथेची रचना नकारात्मक टोनवर जाणारी वाटत असली तरी त्यातील दडलेला सकारात्मक अंश हा नक्कीच हवाहवासा असा आहे. उगाचच भाषणबाजी न करता, ज्याला जे हवं ते करावं असा स्टँड घेत मांडलेली कथा प्रभावी झाली आहे. पण कथानकातलं रहस्य फार काळ टिकत नाही. किंबहुना यामागील संकल्पना थोड्याच काळात प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागते. त्यामुळे पुढचा चित्रपट म्हणजे केवळ नाटक पाहणं इतपतच उरतो. कथेची पकड ढिली पडते. इतकंच नाही तर शेवटी टिपिकल मेलोड्रामा वापरल्यामुळे उगाचच काहीतरी संदेश दिल्यासारखं वाटतं. अर्थात असं असलं तरी जगण्यातला आनंद मांडण्याचा एक चांगला प्रयत्न यातून झाला आहे. स्पर्धेच्या, करिअरच्या आणि आत्ममग्नतेत मश्गुल झालेल्यांना जगण्यातला खराखुरा आनंद मिळवून देण्याचा खटाटोप जमला आहे. मरणात खरंच साऱ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली नाहीत हे सांगण्यासाठी केलेला हा प्रयत्न खूप काही सांगून जाणारा आहे.

निर्माते – अजित साटम, संजय अहलुवालिया आणि बिभास छाया
दिग्दर्शक – उमेश घाडगे
पटकथा आणि संवाद – गणेश मतकरी
संगीत – अमित राज, पंकज पाडघन, शमिर टंडन, सौमिल आणि सिद्धार्थ,
गीत – गुरू ठाकूर, ओंकार मंगेश दत्त, मंदार चोळकर, वरुण लिखते,
संकलन – प्रणव मिस्त्री
कला दिग्दर्शक – तृप्ती ताम्हाणे, विजय कडाली
कलाकार – स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, प्रशांत दामले, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, विवेक लागू, पुष्कर श्रोत्री, मुरली शर्मा, ऊर्मिला कोठारे, जयवंत वाडकर, महेश मांजरेकर.
सुहास जोशी