२००४ आणि २००९ प्रमाणेच यंदाही मुंबईत काँग्रेसला यश मिळेल, असा  विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुंबईने नेहमीच बहुसांस्कृितकपणा जपला आहे. काँग्रेसने सर्व जाती, भाषा, धर्म यांचा आदर केला. तसेच मुंबईच्या विकासात काँग्रेसनेच पुढाकार घेतला, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईतील विविध प्रकल्प किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे राज्य सरकारच्या माध्यमातूनच मार्गी लागले. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने मुंबईत सुमारे एक लाख कोटींचे प्रकल्प हाती घेतले. यातील बहुतांशी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मोनो रेल्वे सुरू झाली. मुंबईकरांचे जीवनमान सोपे करण्याकरिता काँग्रेसनेच पुढाकार घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड हे चार उमेदवार विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नरेंद्र मोदी घटकामुळे मुंबईत काँग्रेसच्या यशावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी शहरात कोणतीही लाट नाही. जातीयवाद्यांना मुंबईकर साथ देणार नाहीत, असा विश्वासही चांदूरकर यांनी व्यक्त केला.