उत्तर प्रदेशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांच्यावर घातलेली भाषणबंदी निवडणूक आयोगाने मागे घेण्यात आली मात्र, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावरील बंदी अजूनही उठविण्यात आली नसल्याने निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय दुर्देवी असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, “फक्त अमित शहांवरील भाषणबंदी मागे घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्देवी आहे. यातून आझम खान यांच्यावर अन्याय झाला आहे. निवडणूक आयोगाचा आम्ही आदर करतो त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्णयाचा पुन्हा फेरविचार करावा आणि आझम खान यांच्यावरील भाषणबंदीही मागे घ्यावी” असे म्हटले आहे. तसेच अमित शहा जातीयवादाचा चेहरा असणारे मंत्री आहेत आणि दुसऱया बाजूला आझम खान निधर्मीवादाचे प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे आयोगाने खान यांना प्रचार करू द्यावा असेही ते पुढे म्हणाले. त्यामुळे दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करून आझम खान यांच्यावरील भाषणबंदी मागे घ्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.