हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही अगदी नवखे असता. त्यात तुमचा भूतकाळ काय.. तर हा एका वाहिनीवर गाजलेल्या मालिकेत नायकाची भूमिका करत होता. एक मालिका, दोन प्रदर्शित झालेले चित्रपट , तिसऱ्या बिग बजेट चित्रपटात केलेली छोटीशी भूमिका आणि बाकी सगळी फक्त तुमच्या नावाने सुरू झालेली चर्चा.. या सगळ्या परिस्थितीत तो कलाकार मोबाइल बंद करून ठेवतो, कोणाशीही संपर्क करत नाही. तेव्हा इंडस्ट्रीत त्याच्या नावाने काय बोंबाबोब केली जाते, याची तुम्हाला कल्पना नसेल. एक नाही, दोन नाही.. तब्बल आठ महिने मी माझी ‘सुशांत’ ही ओळख पुसून टाकली होती. त्यामुळे इंडस्ट्रीत याच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी बोंब सुरू झाली. घरात आता हा आपल्या माणसांना सोडणार अशी धास्ती तर अंकिताच्या मनात भलत्याच शंका..
‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’चे चित्रीकरण करून मुंबईत परत आलो तेव्हा इंडस्ट्रीत मी किती लोकांबरोबर शत्रुत्व ओढवून घेतलं आहे याची कल्पना मला आली, सुशांत सिंग राजपूत हसत सांगतो. उद्याचा ‘स्टार’ कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे, याची त्याला कल्पना आहे. पण, त्या दडपणाखाली त्याला rv08काम करायचं नाही, असं तो म्हणतो. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ हा चित्रपट कादंबरीतून नावारूपाला आलेल्या काल्पनिक गुप्तहेर नायकावर आहे. म्हणजे, माझी स्वत:ची ‘ब्योमकेश बक्षी’ची आठवण म्हणजे दूरदर्शनवर ‘ब्योमकेश बक्षी’ मालिका सुरू झाली की रजत कपूरच्या चेहऱ्याचे स्केच झळकायचे. माझ्यासाठी ‘ब्योमकेश’ची पहिली आणि शेवटची ओळख तीच होती. कारण, त्यावेळी मी लहान होतो. त्यामुळे तो बोलतो कसा, चालतो कसा हे आठवण्याचं कारणच नाही, असं सुशांत सांगतो. मग ‘ब्योमकेश बक्षी’ साकारायचा कसा? तो बाहेरून कसा दिसणार? तो चित्रपटात काय करणार?, हे सगळे प्रश्न दिग्दर्शक म्हणून दिबाकर सोडवणार होता. पण, ‘ब्योमकेश’ नावाचा ‘माणूस’ साकारणं हा प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात अवघड भाग माझ्या वाटय़ाला आला rv05होता, असे सांगणाऱ्या सुशांतने सगळ्यात पहिले शरदिंदू बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या ब्योमकेशच्या सगळ्या ३२ कथा वाचून काढल्या. त्यानंतर चित्रीकरणाच्या आधी दिबाकर रेकीसाठी कलकत्त्यात जाणार असे कळल्यावर तोही तिथे पोहोचला. दिबाकरबरोबर फिरताना, कादंबरीत नमूद केलेल्या खऱ्या जागा हुडकताना आणि तिथल्या लोकांशी गप्पा मारताना ब्योमकेश सापडत गेला. पण, तेवढं पुरेसं नव्हतं. ब्योमके शची व्यक्तिरेखा पूर्णपणे माझ्यात उतरणं गरजेचं होतं. पडद्यावर मी कुठेही सुशांत म्हणून जाणवणं मला रुचणारं नव्हतं. म्हणून आठ महिने मोबाइल बंद, सेटव्यतिरिक्त कोणाशी बोलायचं नाही, असे कडक नियम मी स्वत:ला घालून घेतले होते, असं त्याने सांगितलं. सेटवरही लोकांनी त्याला ‘सुशांत’ म्हणणं सोडून दिलं होतं. मला सगळे ‘ब्योमकेश’च हाक मारत होते. सेटवरचं काम आटोपलं की हॉटेलच्या रूमवर परतून पुन्हा ‘ब्योमकेश’च्या कथांमध्ये मन रमवायचं अशी कठोर साधना या चित्रपटासाठी केली असल्याचं तो म्हणतो.
सुशांतने पहिला चित्रपट केला अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘कायपोचे’, त्यानंतर थेट यशराजचा दुसरा चित्रपट केला तो मनीष शर्मा दिग्दर्शित ‘शुद्ध देसी रोमान्स’, तिसरी ‘पीके’तली छोटी भूमिका आणि आता लागोपाठ ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, शेखर कपूरचा ‘पानी’ आणि महेंद्रसिंग धोनीवरचा चित्रपट.. हे सगळे चित्रपट वेगळे आहेत. आणि ही योगायोगाने घडलेली गोष्ट नाही, असं तो ठामपणे म्हणतो. माझ्याबरोबरचे इतर कलाकार काय करतात, हा विचार मी करत नाही. माझ्यासाठी चित्रपटाची कथा, दिग्दर्शक या गोष्टी फोर महत्त्वाच्या असतात. आत्तापर्यंतच्या या यादीतला केवळ एकच चित्रपट म्हणजे ‘पीके’ हा फक्त मी मला rv06राजकुमार हिरांनीबरोबर काम क रायचं होतं म्हणून केला. राजकुमार हिरानींनी ‘अ‍ॅक्शन’ म्हणून शब्द उच्चारला की मी माझं काम सुरू करावं, या एकाच वेडाने मी ती भूमिका केली आहे, असं सुशांतने सांगितलं. ‘ब्योमकेश’ हा खऱ्या अर्थाने कारकीर्दीला वळण लावणारा सिनेमा ठरेल, असं तो म्हणतो आणि त्याचं श्रेय तो दिग्दर्शक दिबाकरला देतो. दिबाकर खूप अवघड पद्धतीने सहज अभिनय करून घेणारा दिग्दर्शक आहे, असं तो सांगतो. मला दिबाकरने जेव्हा स्क्रिप्ट दिली तेव्हा त्याचे दोन भाग केलेले होते. एकात पटकथा, संवाद होते ते अगदी पातळ असं पुस्तक होतं. त्याच्याबरोबर दिलेलं दुसरं बाड फारच मोठं होतं, ज्यात त्या प्रत्येक संवादाबरोबर येणाऱ्या सूचना, हावभाव असे बारीकसारीक तपशील लिहिले होते. त्याची पद्धतच तशी आहे. त्याने मला तू काय करू नकोस, हेच प्रत्येक वेळा सांगितलं आहे. त्याने दिलेल्या या काय नको करूस अशा यादीतून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हालाच शोधावं लागतं. तुमची व्यक्तिरेखा तुम्हीच घडवत जाता. हा फार सुंदर अनुभव या चित्रपटातून दिबाकरने मला दिला आहे, असं सुशांतने सांगितलं. चित्रपटाबद्दलची कुठलीही घडामोड माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती. तुम्ही जे ऐकलं असेल चुंबनदृश्य वगैरे.. अशा कितीतरी गोष्टी त्याने माझ्याकडून कळत नकळतच काढून घेतल्या आहेत, असं तो म्हणतो.
‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’चा लुक हाही दिबाकरनेच केलेला आहे. माझा चेहरामोहरा त्याने बदलून टाकला. ब्योमकशचे कपडे.. हे सगळं खास बंगाली पद्धतीचं असेल, यावर दिबाकरचा कटाक्ष होता. धोती, ते जाकीट आणि त्याच्या पायातल्या चपला हे सगळं अगदी त्या काळात जसं होतं तसंच वापरण्यात आलं आहे. त्या चपला इतक्या पातळ असायच्या की त्या घालून चालताना पायाला दगड टोचायचे. पण, नाही दिबाकरला ते त्याच पद्धतीचं हवं होतं. त्याने आम्हाला एकाच गोष्टीतून सूट दिली होती ती म्हणजे भाषा. चित्रपटातील व्यक्तिरेखा बंगाली असली तरी आपल्याला हिंदीच चित्रपट बनवायचा आहे हे त्याचं ठाम मत होतं. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात ब्योमकेश कुठेही तुम्हाला बंगाली बोलताना दिसणार नाही, असं सुशांत म्हणतो. पण, बंगाली लोकांना त्यांच्या संस्कृतीचा कडवा अभिमान असतो त्यामुळे एवढं करूनही मी साकारलेल्या बंगाली ब्योमकेशमध्ये बंगाली लोकांना चुका तर आढळणार नाहीत ना?, अशी शंकाही दिबाकरकडे व्यक्त केल्याचे तो म्हणतो. मात्र, आपण खूप अभ्यास करून ही व्यक्तिरेखा रंगवतो आहोत. जर काही बरोबर ठरलं ते तुझं यश असेल आणि जे काही चुकीचं ठरेल ती माझी जबाबदारी.. इतकं स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या दिग्दर्शकाने दिल्यानंतर काय बिशाद तुमची की तुम्ही काम चांगलं करणार नाही?, असा मिश्कील सवालही त्याने केला.
बॉलीवूडच्या हिरोंप्रमाणे काहीच करायचं नाही, असा चंगच जणू बांधलाय त्याने.. हातात असलेले चित्रपट पूर्ण झाले की लगेचच प्रेयसी अंकिता लोखंडेबरोबर विवाह करण्याची त्याची योजनाही निश्चित आहे. विवाहामुळे कामावर परिणाम होईल वगैरे गोष्टीवर त्याचा विश्वास नाही. मात्र, अचानक मिळालेल्या या ‘स्टारडम’बद्दल तुला काय वाटतं?, या प्रश्नावरही तो सडेतोड उत्तर देतो. ‘स्टारडम’वर त्याचा विश्वास आहे. तुम्हाला ज्या एरव्ही ‘अशक्य’ गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या  हे ‘स्टारडम’ मिळाल्यावर पूर्ण होतात, असं तो स्पष्टपणे सांगतो. तुमच्याकडे पैसा आलाच पाहिजे. पैसा आला की मग त्याची ‘गरज’ उरत नाही.. त्याचं हे विधान तो अधिक विस्ताराने सांगतो. म्हणजे ‘रेंज रोव्हर’ हे माझ्यासाठी एके काळी स्वप्न होतं आज ती माझ्याकडे आहे. आज प्रत्येक चित्रपट मला पैशासाठी करावा लागत नाही. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे मला हवे तेच चित्रपट मी करतो, असं तो ठामपणे सांगतो. सध्या ‘महेंद्र सिंग धोनी’वर काम सुरू आहे आणि मग शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’. पण, सध्या तरी त्याला ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ला मिळणाऱ्या प्रतिसादाची उत्सुकता आहे. हा चित्रपट यशस्वी ठरला तर ब्योमकेशच्या सगळ्या ३२ कथा पडद्यावर आणण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

सुशांत सिंग राजपूत
आपण खूप अभ्यास करून ब्योमकेश बक्षी ही व्यक्तिरेखा रंगवतो आहोत. जर काही बरोबर ठरलं ते तुझं यश असेल आणि जे काही चुकीचं ठरेल ती माझी जबाबदारी.. इतकं स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या दिग्दर्शकाने दिल्यानंतर काय बिशाद तुमची की तुम्ही काम चांगलं करणार नाही?
तुमच्याकडे पैसा आलाच पाहिजे. पैसा आला की मग त्याची ‘गरज’ उरत नाही. म्हणजे ‘रेंज रोव्हर’ हे माझ्यासाठी एके काळी स्वप्न होतं आज ती माझ्याकडे आहे. आज प्रत्येक चित्रपट मला पैशासाठी करावा लागत नाही. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे मला हवे तेच चित्रपट मी करतो..