गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेमार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाली. कल्याण स्थानकानजीक आज सकाळी कल्याण-अमरावती एक्सप्रेस गाडीचे इंजिन एका डब्यासह रूळावरून घसरले. यामुळे अप मार्गावरील सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाशिक-इगतपूरी-कल्याण मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रकही या अपघातामुळे कोलमडले आहे.  मध्य रेल्वेमार्गावर अशाप्रकारच्या अपघाताची ही महिन्यातील पाचवी घटना आहे. यामुळे रेल्वेमार्गाच्या देखभालीसंदर्भात गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने सुरू असलेल्या या घटनांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या मार्गावरील सुरू होण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.