सहा वर्षापुर्वी मुंबईवर झालेल्या २६११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ट्विटरवरून आदरांजली वाहिली. यावेळी राज्यातील पोलिस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबईसाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या धाडसी पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, आगामी काळात राज्याला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हल्ल्यातील शहीदांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहताना, दहशतवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी देशवासीयांनी स्वत:च्या मनाशी निर्धार करावा, असे आवाहन केले.