नरेंद्र मोदी लाटेत उत्तर मुंबईत भाजपने नुसतेच यश मिळविले नाही तर भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम केला. भाजपच्या या यशाने सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन जागा ताब्यात असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या गोटात साहजिकच चिंतेचे वातावरण तयार झाले. एकूणच मतदारसंघाचा कल लक्षात घेता लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या वेळी होण्याची शक्यता आहे.
बोरिवली, दहिसर, मागठाणे, चारकोप, कांदिवली पूर्व आणि मालाड हे सहा विधानसभा मतदारसंघ उत्तर मुंबईत समाविष्ट आहेत. बोरीवली व चारकोपमध्ये भाजप, दहिसर येथे शिवसेना, मागठाणे येथे मनसे तर कांदिवली व मालाडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभेतील यशामुळे महायुतीच्या आशा या मतदारसंघात पल्लवित झाल्या आणि साहजिकच भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांची संख्याही वाढली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतविभाजनाचा काही प्रमाणात सत्ताधाऱ्यांना फायदा झाला होता. यंदा मात्र मनसेमुळे मतविभाजनाचाच नव्हे, तर कोणताच फटका बसणार नाही, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे.
विधानसभा मतदारसंघांतील चित्र
बोरिवली- गुजरातीबहुल असलेल्या या मतदारसंघावर भाजपचे प्रथमपासून वर्चस्व राहिलेले आहे. राम नाईक हे या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत असत. ते लोकसभेमध्ये गेल्यानंतर भाजपने गोपाळ शेट्टी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. शेट्टी यांनीही सलग दोन वेळा येथून विजय मिळवला तेही मुंबईत सर्वाधिक मते मिळवून. मोकळ्या जागांवर अनधिकृत झोपडय़ा अथवा बांधकामे उभी राहणार नाहीत यासाठी सातत्याने दक्ष राहातानाच शेट्टी यांनी अनेक सुंदर उद्याने व मैदानांचे निर्माण केले. भाजपसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून भाजपचे विनोद तावडे लढणार हे आता स्पष्ट झाले आहे.
दहिसर- विद्यमान आमदार विनोद घोसाळकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात. त्यांचे चिरंजीवही शिवसेनेचे ननगरसेवक असून गेली अनेक वर्षे येथील विभागप्रमुख असलेल्या घोसाळकर यांच्यामुळे उत्तर मुंबईत शिवसेना भाजपला टक्कर देत आपले स्थान टिकवून आहे.
मागठाणे- मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या मतदारसंघात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आपले स्थान भक्कम करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसे येथून न लढल्याचा फटका विधानसभेत बसण्याची भीती मनसेच्याच पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दरेकर यांना ही जागा राखून ठेवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत. अर्थात त्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे दरेकर यांनी मतदारसंघात लोकोपयोगी उपक्रमाचा आणि जनसंपर्काचा धडाका लावला आहे. शिवसेना आणि मनसेच्या वादाचा फायदा उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.
कांदिवली पूर्व- उत्तर भारतीयांचा प्रभाव असलेल्या या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रमेशसिंग ठाकूर सहज विजयी झाले होते.  लोकसभा निवडणुकीत ठाकूर यांनी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांना साथ न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात येथे उत्तर भारतीयांचा एक गट नाराज आहे. आमदार रमेशसिंग यांच्या कुटुंबीयांची येथे महाविद्यालये, शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय असे अनेक शैक्षणिक उपक्रम असून याचा फायदा त्यांना मिळणार आहे. भाजपच्या वतीने अतुल भातखळकर हे इच्छुक आहेत.
चारकोप- गुजराती व मराठीबहुल असलेल्या या मतदारसंघावर भाजपच्या योगेश सागर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून त्यांचा विजय हा औपचारिक ठरेल असे चित्र आहे. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सागर यांनी महापालिकेतही आपल्या कामाचा ठसा निर्माण केला होता.  योगेश सागर यांच्यासमोर टक्कर देईल असे उमेदवार सध्यातरी काँग्रेस व मनसेकडे दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक लाख १५ हजार ८६५ मते मिळाली असून मताधिक्य वाढविणे हेच एक आव्हान सागर यांच्यापुढे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मालाड-  काँग्रेसचे अस्लम शेख यांना जातीपातीच्या गणितांची साथ मिळत असली तरी नगरसेवक ते आमदार म्हणून त्यांची कामगिरीही निश्चित विचारात घेण्यासारखी आहे. लोकांसाठी केव्हाही उपलब्ध राहणारा लोकप्रतिनिधी अशी शेख यांची ख्याती असल्यामुळे या मतदारसंघात युतीपुढे कडवे आव्हान असेल. मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या मोठी असून गुजराती मतदारांचे प्रमाणही चांगले आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे शेट्टी यांना मताधिक्य मिळाल्याने महायुतीच्या दृष्टीने ही बाब समाधानाची ठरणार आहे.दिग्गजांची कसोटी
बोरिवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गोपाळ शेट्टी यांची लोकसभेवर निवड झाल्याने या मतदारसंघावर भाजपमधील अनेकांचा डोळा आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची विधानसभेवर निवडून जाण्याची इच्छा आहे. शेजारील मागठाणे मतदारसंघ कायम राखण्याचे मनसेचे प्रवीण दरेकर यांच्यासाठी आव्हान राहणार आहे.  आता मात्र, महायुतीने लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर पुन्हा मुसंडी मारली आहे आणि ती रोखून आपापल्या जागा कशा टिकवायच्या हा प्रश्न मनसे आणि काँग्रेसपुढे उभा राहिला आहे.