केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील नियंत्रण मे २०१३पासून हटविल्यानंतर रेशन दुकानातून साखर जवळपास बेपत्ता झाली होती. तथापि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अभिनव खरेदी योजनेमुळे ऐन सणासुदीला दोन कोटी पिवळे रेशनकार्डधारक आणि एक कोटी अंत्योदय योजनेतील गरीबांना रेशनच्या दुकानावर आता साखर उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे बाजारभावापेक्षा कमी दराने राज्यात साखर खरेदी झाली असून जुलै आणि ऑगस्टमधील खरेदीच्या किमतीचा विचार करता अन्न व नागरी पुरवठा विभागाने सरकारचे एक कोटी चौदा लाख रुपये वाचविले आहेत.
केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील नियंत्रण उठविल्यापासून कारखान्यांकडील नियंत्रित (लेव्ही) साखर सार्वजनिक  वितरण व्यवस्थेला उपलब्ध होत नव्हती. परिणामी नवीन धोरणानुसार खुल्या बाजारातून साखर खरेदीचा निर्णय घेण्यात आला.  वित्तीय अटींमुळे साखर संघाकडे प्रयत्न करूनही साखर उपलब्ध होऊ न शकल्यामुळे गणेशोत्सव ते दिवाळी दरम्यान रेशन दुकानांमध्ये साखर उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अंत्योदय योजनेचे एक कोटी लाभार्थी आणि बीपीएलखालील पिवळी शिधापत्रिका असलेल्या दोन कोटी लोकांना कोणत्याही परिस्थितीत सणासुदीला साखर उपलब्ध करून देणे अत्यावश्यक होते.
एरवी प्रतिव्यक्ती रेशन दुकानावर ५०० ग्रॅम साखर दिली जाते, तीच सणासुदीला ६६० ग्रॅम दिली जाते. परंतु साखरच उपलब्ध होत नसल्यामुळे ई-निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये देशातील तसेच फ्रन्समधील मिळून ५३ कंपन्यांनी निविदा भरल्या. ऑनलाईन प्रक्रिया करून तात्काळ जिल्हानिहाय साखर खरेदी करण्यात आली.  

तीन कोटी शिधापत्रिकधारकांसाठी १,८४,७४७ क्विंटल साखरेची गरज आहे. जुलैमध्ये आम्हाला ३१ रुपये ९७ पैसे दर मिळाला तर ऑगस्टमध्ये ३१ रुपये ३१ पैसे दर मिळाला. याच काळात केंद्राचा दर ३२ रुपये तर खुल्या बाजारात सुमारे ३५ ते ३८ रुपये किलोने साखर उपलब्ध होती. परिणामी एका महिन्यात एक कोटी १४ लाख रुपये वाचवण्यात यश आले.
– दीपक कपूर, सचिव,  अन्न व नागरी पुरवठा विभाग