१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाण्यादरम्यान धावली असली तरी पुढे कल्याण हे या मार्गावरील जंक्शन स्थानक बनले. रेल्वेस्थानक, कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्यासाठी लागणारा दगड या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे या उभारणीचा खर्च आणि वेळ वाचणार होता. मात्र, त्याच वेळी तत्कालीन कल्याण पालिकेने रेल्वेला पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्या वेळी कल्याण शहराला (खरेतर गावच ते!) काळा तलावातून पाणीपुरवठा होत होता. पाणी मिळणार नाही म्हटल्यावर रेल्वेची पंचाईत झाली. त्यामुळे ग्रेट इंडियन पेनन्सुला कंपनीने अंबरनाथला जंक्शन स्थानक करण्याचा विचार सुरू केला. परंतु अंबरनाथ परिसरात बांधकामासाठीचा दगड उपलब्ध नव्हता. अखेर अंबरनाथजवळील काकोळे तलावावर धरण बांधून तेथून पाणी कल्याण स्थानकापर्यंत आणण्यात आले. पुढे कल्याण हे जंक्शन बनले. भारताच्या कानाकोपऱ्यातून ये-जा करणाऱ्या गाडय़ा कल्याण स्थानकातून सुटतात. प्रवाशांची गर्दी कल्याण स्थानकाच्या पाचवीला पूजली आहे. या पाश्र्वभूमीवर स्वातंत्र्यापूर्वीचे हे रूप वेगळे आणि नेटके वाटते.